नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा येथे ग्रामस्थांनी केले रेल रोको आंदोलन

खानदेश एक्सप्रेसच्या धर्तीवर उदना- जळगाव-पुणे ही नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील नरडाणा, दोंडाईचा आणि शिंदखेडा या तीन रेल्वे स्टेशनवर स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थांनी उदना-जळगाव-पुणे रेल्वेसाठी रेल रोको आंदोलन काल केले.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी नरडाणा रेल्वे स्टेशनवर पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शन वरून मुंबईला जाणार्‍या खानदेश एक्सप्रेसच्या धर्तीवर उदना- जळगाव-पुणे ही नवीन रेल्वे सुरू करावी, यासह रात्री धावणार्‍या सुरत गाड्या दिवसा कराव्यात, मुंबई गाडीच्या वेळेत बदल करावा, नरडाणा स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, परिसरातील गावे, रहिवाशी व शेतकर्‍यांच्या सोयीसाठी नरडाणा येथे रेल्वे लाईन वर रेल्वे अंडरपास बोगदा मंजूर करावा, या सह अनेक वर्षापासून रखडलेल्या मागण्यांसाठी शेकडो नागरिक रेल रोको आंदोलनात सहभागी होऊन रेल्वे पटरीवर उतरले होते.

नरडाणा हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील व नरडाणा एमआयडीसी लगतचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. येथे अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळावा ही मागणी आहे. याच बरोबर आता पुण्याचे वाढते शैक्षणिक औद्योगिक व आयटी क्षेत्रातील महत्त्व बघता पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे. धुळ्यातून रोज दोनशे तीनशे खाजगी ट्रॅव्हल्स पुण्या साठी धावत असतात. प्रवाशांचा खर्च वेळ त्रास वाचावा यासाठी पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शन वरून नव्याने उदना-जळगाव-पुणे गाडी सुरू करावी अशी प्रवाशांचे वाढती मागणी आहे. वेळोवेळी मागणी करू नही ती पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी रेल्वे रोको चा निर्णय प्रवाशांना घ्यावा लागला.

सकाळ पासूनच आंदोलन करत्यांची नरडाणा रेल्वे स्टेशनवर गर्दी वाढायला लागली. याबरोबर पोलिसांची संख्याही वाढायला लागली. पोलिसबळाला दाद न देता शेकडो कार्यकर्ते रेल्वे पटरीवर उतरले ’हमारी मांगे पुरी करो, उदना-पुणे गाडी सुरू करो.’ यासह अनेक घोषणांनी रेल्वे स्टेशन दुमदुमले. भुसावळ नंदुरबार पॅसेंजर गाडीला अडवून लोकांनी रेल्वेचा ताबा घेतला. शेवटी रेल्वेचे अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून लवकरच रेल्वे मंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहचवू व यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले. नरडाणा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. निलेश मोरे साहेब यांनीही आंदोलन कर्त्यांना शांत केले व मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले परंतु पुढील तारखे पर्यंत वरिल मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे पटरीवर झोपून अमरण आंदोलन करू असा इशारा दिला.

संजीवनी सिसोदे, सिद्धार्थ सिसोदे, राजेश बोरसे, प्रवीण देसले, संजय खैरनार, विश्वास देसले, रमेश सिसोदे, शंकर सिसोदे, सागर सूर्यवंशी, प्रदीप चोरडिया, निंबा दादा साळुंखे, मन्साराम बोरसे, लखन नेतले, राकेश नेतले, गणेश मोरे, जिजाबराव सिसोदे, संदीप निकम, गोरख भामरे, सुनील भामरे, जगदीश पवार, अंकुश साळुंखे, मयूर सिसोदे, संजय बोरसे, विजय बोरसे, संदीप कदम, सतीलाल देसले सर, महेश सिसोदे, विशाल मलकेकर, सुनील पाटील, बाळा पवार, दीपक महाराज, रोहित बोरसे, ज्योती फुलपगारे, मोहित सिसोदे, हरीश सिसोदे, जगदीश कोळी, तेजस कलाल सह अनेक ग्रामस्थ व प्रवासी आंदोलनात सहभागी झाले होते.

नरडाणा बरोबरच दोंडाईचा येथे प्रवीण महाजन आणि शिंदखेडा येथे गोविंद मराठे यांच्या उपस्थितीत रेल्वे आंदोलन झाले. दोंडाईचा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांचे वडील सरकार साहेबराव रावल स्वतः आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांना रेल्वे प्रशासनाने लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असे समजते तसेच आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढणार आहेत असे नरडाणा भेटीत मंत्री महोदयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *