काम फद्याचं करायचं नाही, उलट चालू कामांना ब्रेक लावायचा ही काय मानसिकता ? – आ. अनुप अग्रवाल विरोधकांवर बरसले

प्रभाग चारमधील उद्यान विकासाचे भूमिपूजन प्रसंगी विरोधकांवर साधला जोरदार निशाणा

धुळे शहर

“काम फद्याचं करायचं नाही, एक रूपया या शहराच्या विकासासाठी आणायचा नाही, उलट चालू कामांना ब्रेक लावायचा, विकासकामे बंद करायचे, ही काय मानसिकता ? ” अशा शब्दात आ. अनूप  अग्रवालांनी आज विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. 

धुळे शहरातील प्रभाग चारमधील जयहिंद कॉलनी व आनंदनगरला लागून असलेल्या मोकळ्या जागेत उद्यान विकासाचे काम सुरू आहे. या जागेत जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकव्यवस्था, एलईडी दिव्यांचे सोय करण्यात येत आहे. माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी विशेष पाठपुरावा करत नागरी दलितेतर निधीतून हे काम मंजूर करून घेतले होते. त्याचे भूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, माजी संघटनमंत्री यशवंत येवलेकर, देवपूर मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, राजे शिवाजी हेल्थ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. टी. देवरे, ॲड. एम. एस. पाटील, गुलाबराव पाटील, एस. एम. पाटील, प्रा. मोहन भदाणे, सी. एन. देसले, प्रा. बी. एन. पाटील, यशवंत गोसावी, निशा चौबे, चारुहास मोराणकर आदी उपस्थित होते.

नकाणे रोडवर शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनाचा आज आ. अनुप अग्रवाल यांनी समाचार घेतला. मनोज मोरेंचे नाव न घेता ते म्हणाले की, ‘खड्डा पडला तर पडला, होईलना काम, त्यात जावून बसून गेले, काम फद्याचं करायचं नाही, एक रूपया या शहराच्या विकासासाठी आणायचा नाही, उलट चालू कामांना ब्रेक लावायचा, विकासकामे बंद करायचे’ अशा शब्दात आ. अग्रवालांनी सेनेच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली.

आ. अग्रवाल म्हणाले की, ‘विकासकामे करताना चुका होत राहतात, उन्नीस बीस होतचं. चुकांचं आम्ही समर्थन करत नाही, चुकलं असेल शिक्षा झालीच पाहिजे. परंतु नाहक आंदोलन करून जनतेला, प्रशासनाला वेठीस धरणे योग्य नाही. कारण, प्रशासनाची साथ असल्यावरच कामे होतात. सर्वांशी समन्वय साधूनच विकास करायचा आहे. जे मुजोर अधिकारी असतील त्यांनाही आम्ही सोडणार नाही, असेही आ. अनुप अग्रवालांनी सांगितले. तसेच विकासकामांना विरोध करणाऱ्यांबद्दल त्यांनी नाराजी प्रकटली. छत्रपर्तीचे स्मारक काय नडत होते; त्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. कोर्टात आम्ही लढणारच; पण ही कोणती मानसिकता आहे ? असे वागणे बरोबर नाही, या मानसिकतेतून सर्वांना बाहेर यावं लागणार असल्याचेही आ. अग्रवाल म्हणाले.

तसेच देवपूरमधील भूमिगत गटारांचे काम पूर्णत्वास आले असून, रस्त्यांची बहुतांश कामे झाली आहेत. आता शहराच्या पेठेसह उर्वरित भागातील भूमिगत गटारीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ते पूर्णत्वास यायला वेळ लागेल. मात्र, ते पूर्ण झाल्यानंतर सर्वच रस्ते चकाचक होतील. आता शहरात भर उन्हाळ्यातही कुठे एक दिवसाआड तर कुठे दोन दिवसांआड विनाअडथळा मुबलक पाणीपुरवठा झाला. याशिवाय अनेक विकासकामे सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी केंद्र, राज्यासह धुळे महापालिकेतही सत्ता असणे आवश्यक आहे. आता केंद्रासह राज्यात भाजप- मित्रपक्षांची सत्ता आहे. यामुळे शहराच्या विकासाला वेग देण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता द्या.
माजी महापौर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. संजीव कुलकर्णी, संजय चोरडिया, प्रा. हर्षदीप पाटील, योगेश मोराणकर, प्रवीण बोरसे, भोजूसिंह राजपूत, निलेश राजपूत, दादा ठोंबरे, शेखर कुलकर्णी, नीरज अग्रवाल, संजय ठाकूर, अविनाश पाटील, यतीन पाटील, सीमा वाघ, वसुमती पाटील आदींनी संयोजन केले. अमोल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सागर चौधरी यांनी आभार मानले.

सफारी गार्डनऐवजी उभारणार श्रीराम सृष्टी!
शहरातील नागपूर- सुरत बायपास रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ५१० मधील सुमारे २५ एकर जागेवर श्रीराम सृष्टी साकारण्यास प्राधान्य दिले आहे. या थीम पार्कसाठीची कार्यवाही सुरू झाली असून, मोजमाप झाले आहे. महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर झाला आहे. तो मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे पाठविला जाईल. तेथे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर ही जागा महापालिकेकडे वर्ग होऊन कामास प्रारंभ होईल. यावर्षीच्या पावसाळ्यात या जागेवर वृक्षारोपण केले जाणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह शहरवासीयांनी तेथे वृक्षारोपणासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *