गुजरातमधून आलेल्या 4 खासगी ट्रॅव्हल्स बसवर कारवाई
धुळे जिल्हा
खरिपाच्या पेरणीसाठी जर अंकुर कंपनीचे कापूस बियाणे वापरणार असाल तर शेतकऱ्यांनी सावध रहाणे आवश्यक आहे, कारण गुजरात येथून अंकुर आणि इतर प्रसिद्ध वाणाचे बनावट बियाणे महाराष्ट्रात विकण्यासाठी आणले जात असल्याचे उघड झाले आहे.
धुळे कृषी विभागाच्या पथकाने धुळे शहरात खाजगी ट्रॅव्हल्स वाहनांमधून १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणे जप्त केेले आहेत. विशेष म्हणजे कृषी विभागाच्या पथकातील अधिकारी, कर्मचार्यांनी वेशभूषा बदलून ही धाडसी कारवाई केली.
कृषी अधिकार्यांनी रात्रभर गस्त घालत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मधून येणार्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनांवर छापा टाकून लाखो रुपयांचे बनावट बियाणं व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणं जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि धुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने केली आहे.
या कारवाईमध्ये सुमारे बाराशे ते तेराशे बनावट बियाण्यांचे पाकिटे जप्त करण्यात आले. हे बियाणं गुजरात मधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात होती. अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती तर पीनगार्ड, राशी ६५९ ५ अशी बनावट पाकीट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात बेकायदेशीरपध्दतीने आणले जात असतांना कृषी विभागाच्या पथकाने वेशातंर करुन कारवाई केली. मध्यरात्री उशिरा शिरुड जवळ वाशीम – धुळे या खासगी ट्रॅव्हल्स बस मधून ३ लाख ४२ हजाराचे बियाणे जप्त करण्यात आले. तसेच यानंतर पथकाने धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात देखील गुजरात मधून येणार्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यात अहमदाबाद – अकोला, अहमदाबाद – नांदूरा आणि अहमदाबाद – अकोला अशा तीन ट्रॅव्हल्स मधून शेकडो बनावट बियाण्यांची पाकिटे हस्तगत करण्यात आली. एकुण १८ लाख ७६ हजार ५०० रुपये किंमतीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे विभागीय गुण नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर यांनी दिली.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात खरीप हंगामात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अंकूर, पीनगार्ड अशा नामांकित कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करुन ते गुजरात मधून येथे विक्रीसाठी आणले जात असल्याचे या कारवाईतून उघड झाले असल्याचेही कृषी विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले. या कारवाई प्रकरणी धुळे शहर आणि धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.
कृषी विभागाचे विभागीय गुण नियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर, तंत्र अधिकारी उपविभागीय अधिकारी मनोज कुमार शिसोदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, कृषी अधिकारी जगदिश बोराळे, कृषी सहाय्यक मनोज पाटील, कृषी सहाय्यक नितीन मासुळे यांनी ही धाडसी कारवाई केली आहे.