नांदावेत गुण्यागोविंदाने ‘ते’ प्रार्थना निष्ठावंतांची फळणार का ?

“लोकवृत्त” कटाक्ष…

जिल्हाध्यक्षपदाची माळ पडताच 
गळ्याला गळे भेटू लागले,
नांदावेत गुण्यागोविंदाने ‘ते’
प्रार्थना निष्ठावंत करू लागले!!

मनोमिलन दोघांचे होईल अशी
खात्री नेते देतील का?
खोऱ्याने ओढतांना दोन्ही नेते 
एक-दुसऱ्याचे होतील का!!

वरील मार्मिक “काव्य चारोळी” आज धुळे जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे दोन मातब्बर नेते एकमेकांना लाडू भरवतांनाचे छायाचित्र समाज माध्यमांवर तसेच वृत्तपत्रीय अभिनंदन जाहिरातींमध्ये ठळकपणे प्रकाशित झाल्याने “लोकवृत्त”च्या शीघ्र कवींना सुचल्या..! कारण की, हे दोन नेते एकाच पक्षात आणि आजी-माजी आहेत, मात्र दोघही एकमेकांना चांगलेच ‘पाण्यात’ पहात होते अशी सांगोपांग चर्चा राजकीय वर्तुळामध्ये नव्हे तर त्याच राष्ट्रव्यापी पक्षाच्या गल्लीपासून तर राजधानी पर्यंतच्या नेतेमंडळींपर्यंत रंगली होती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्षांच्या पदावर वर्णी लागण्याच्या वेळेपासूनच या उभयनेत्यांमध्ये कलगीतुरा रंगू लागला होता. आप-आपल्या समर्थकांमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांवर चांगलेच तोंड सुख घेत होते, असे सुद्धा राजकीय गोटात सांगण्यात येते. हा पक्षांतर्गत गटबाजीचा झगडा निवडणुकांमध्येही गाजल्याचे मानले जाते. या बेदिलीचा फटका असा बसला की एका नेत्यास स्व ‘संरक्षण’ करणे ही जमले नाही आणि आजीचे माजी व्हावे लागले.

यांचे पडसाद पुढे महाराष्ट्राच्या आखाड्यात सुद्धा उमटले म्हणतात..! परंतु ‘लोक भावना’ आपल्या बाजूने वळवून माजी जिल्हाध्यक्षांनी विरोधकांचे ‘पतंग’ कापत आपला संकल्प पूर्ण करून दाखवला. मग काय “उगवत्या सूर्यास नमस्कार” या उक्तीनुसार तमाम दरबारी जुळवून घेत जय जयकारात सामील झाले.

“राजकारणात कधी कोणी कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो” हा धडा सुद्धा या नेत्यांनी चांगलाच गिरवला असावा! असेच आजच्या एकमेकांना ‘लाडू’ भरवण्याच्या छायाचित्रामुळे म्हणता येईल. तसे झाले असेल तर मग राष्ट्रव्यापी पक्षास येथील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही ठाणी खिशात घालण्यास जड जाणार नाही आणि पूर्वी प्रमाणे एकमेकांची उणीदुणी काढत बसण्या ऐवजी “एकमेका साह्य करू अवघे भरू…. ” म्हणत खऱ्या अर्थाने खोऱ्याने विकास साधला जाईल. असा देखील राजकीय जाणकारांचा होरा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *