धुळे जिल्हा
प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी, 2026) घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली शिफारस समितीची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात उत्युत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे केंद्र शासनाने राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. या समितीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री निलेश राणे हे या समितीचे सदस्य असणार आहे.
ही समिती शासनाकडे विविध माध्यमातून प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन केंद्र शासनाकडे पद्म पुरस्कारांसाठी योग्य नावांची शिफारस राज्य शासनास करील.