धुळे जिल्ह्यातील 99 शेतकऱ्यांच्या वारसांना 1 कोटी 95 लक्ष अनुदान वितरीत

*गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना;*

*अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक आधार देणारी योजना*

*जिल्ह्यातील 99 शेतकऱ्यांच्या वारसांना 1 कोटी 95 लक्ष अनुदान वितरीत*

धुळे जिल्हा

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक सहाय्य करण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा विमा सानुग्रह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात 31 मार्च, 2025 अखेर 99 शेतकरी कुटूंबाच्या वारसांना 1 कोटी 95 लक्ष रक्कमेचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करुन संकटातून बाहेर काढत त्यांना आर्थिक आधार देणारी ही योजना आहे.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत सन 2024-2025 या वर्षात धुळे तालुका 56, साक्री तालुका 23, शिरपूर तालुका 23, शिंदखेडा तालुका 33 असे एकूण 135 प्रस्ताव प्राप्त झाले होते. यात शेतकरी मृत्यू प्रकरणाचे 96 तर 3 प्रस्ताव अंपगत्वाचे प्राप्त झाले होते. यापैकी 7 अर्ज नामंजूर, 22 अर्ज कागदपत्रांअभावी प्रलंबित असून 7 प्रकरणे तालुका समिती पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.

*सानुग्रह अनुदानासाठी पात्रता*

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीजपडून झालेला मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

*विमा संरक्षणासाठी समाविष्ठ नसलेले अपघात*

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबी या योजनेंतर्गत अपात्र असतील.

ही योजना संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच योजनेच्या विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या 24 तासांसाठी लागू आहे. तथापि, या योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजेनेअंतर्गत लाभ मिळण्यास अपात्र असेल.

*देण्यात येणारे सानुग्रह अनुदान*

अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी 2 लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

*आवश्यक कागदपत्रे*

विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गांव नमुना क्र.6 नुसार वारसाची नोंद, शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र अथवा ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल तसेच अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्याचे वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यापासून तीस दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक राहील. प्रस्तावासाठी कृषि विभागाचे संबंधित गावातील कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *