पाकिस्तानवरील हल्ल्याचे धुळ्यात स्वागत
शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करीत जल्लोष
धुळे जिल्हा
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात घूसून अतिरेक्यांची ९ ठिकाणे उध्वस्त केली. या कारवाईनंतर शिवसेनेतर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौकात आनंदोत्सव आणि जल्लोष करण्यात आला.
शिवसेनेच्या ओबीसी व्हिजेएनटी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेळी मेंढी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी भातर माता की जयच्या घोषणा देत जल्लोष केला. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा बदला पुर्ण झाल्याचे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले. हातात तिरंगा झेंडा घेवून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले. राज्याच्या दौर्यावर असलेले किसवे हेही या आनंदोत्सवात सहभागी झाले.
भारताने पहलगाम घटनेचा बदला घेतला आणि जगाला दाखवून दिले, की या पुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही. भारतीय सैन्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले शौर्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी दिली.