शिरपूर तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात

वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीटमुळे अनेक गावांत झालेल्या नुकसानाची प्राथमिक पाहणी करून पंचनामे

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीटमुळे अनेक गावांत झालेल्या नुकसानाची प्राथमिक पाहणी करून पंचनामे करण्याचे काम तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती तहसिलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिके, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनास दिले होते. त्याचबरोबर आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा यांनीही पंचनामे करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसिलदारांना नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील मौजे करवंद, बाळदे, जातोडे, उंटावद, भोरखेडा, भावेर, खरदे, आढे, सावळदे, पिंपरी, आमोदे, दहीवद, असली, कळमसरे, अजंदे, वाघाडी, अर्थे, लौकी, टेम्भे बु, तरडी या गावात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहे. तसेच करवंद व वाघाडी या भागात तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केळी व पपईच्या नुकसान झालेल्या फळबागेची स्वत: पाहणी केली.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी केळी व पपई फळपिकांचा पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा 14447 या टोल फ्री क्रमांकावर आपल्या नुकसानीबाबत (सूचना) द्यावी, असे आवाहनही तहसीलदार (शिरपूर) महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *