जामखेडी प्रकल्पातून 4 गावांसाठी पिण्यासाठी आरक्षित पाणी सोडणार – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
धुळे जिल्हा
साक्री तालुक्यातील जेबापूर, दापूरा, रोहण, सामोडे या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने या गावातील पाणी टंचाई निवारणार्थ जामखेडी मध्यम प्रकल्पातून 19.282 दलघफु इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
साक्री तालुक्यातील जेबापूर, दापूरा, रोहण, सामोडे या गावात पाणी टंचाई दिसून येत असल्याने जामखेडी मध्यम प्रकल्पातील आरक्षित असलेले पिण्याचे पाणी सोडणेबाबत विनंती प्रशासनास केली होती. त्यानुसार जामखेडी मध्यम प्रकल्पामधून साक्री तालुक्यातील 4 गावांसाठी 19.282 दलघफु पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षित पाण्याचे एकाच आवर्तन सोडण्यात येणार आहे.
पाणी आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढण्यात याव्यात व पुन्हा पाणी अडविले जाणार नाही, याबाबत कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, धुळे यांनी संनियंत्रण करावे तसेच पाणी अडविले किंवा अनाधिकृत उपसा होणार नाही याबाबत संनियंत्रण तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी करावे. आवश्यक असल्यास पाणी सोडण्यापूर्वीच पोलीस बंदोबस्ताची मागणी करुन नियोजन करावे. पाणी सोडल्यानंतर नागरिकांकडून पाणी अडविणे, चारी / कॅनाल फोडणे, विद्युत पंपाद्वारे पाणी गळती करणे या सारख्या अनुचित प्रकार न होण्यासाठी पोलीस विभागाने गस्ती वाहनाने वेळोवेळी भेटी द्याव्यात.
धरणातील पाणी साक्री तालुक्यातील गावांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी संबधित ग्रामपंचायत, तहसिलदार, उपअभियंता ग्रा.पा.पु.वि. पंचायत समिती, उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पोलीस निरीक्षक, उपअभियंता पाटबंधारे विभाग व तलाठी/ग्रामसेवक यांची संयुक्तीकरित्या राहील. पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु.विभाग, जिल्हा परिषद यांनी पाटबंधारे विभागास जमा करुन घेवून त्यानंतरच पाणी सोडण्याची कार्यवाही करावी. असेहीर जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.