महाराष्ट्रातील रुग्णालयांचे वर्तन ‘रुग्णलुटारु’- डॉ. ओमप्रकाश शेटे

महाराष्ट्रातील रुग्णालयांचे वर्तन ‘रुग्णलुटारु’ !

हा तर वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार !!

“सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये” – डॉ. ओमप्रकाश शेटे यांचे जाहीर आवाहन

मुंबई

महाराष्ट्रात रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकींमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत संबंधित रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतांना देखील वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे. असा गंभीर ठपका ठेवत आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे यांनी सर्व रुग्णालयांना “सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये”  असे जाहीर आवाहन करीत एक पत्र जारी केले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात केवळ पैशांसाठी गर्भवती महिलेला उपचार नाकारण्यात येऊन तिला आपले प्राण गमवावे लागले संपूर्ण महाराष्ट्राला लाज आणणाऱ्या आणि आरोग्य क्षेत्राची विशेषतः धर्मदाय रुग्णालयांच्या लुटमारीचा विषय चर्चेत आला सर्वच स्तरातून याविरुद्ध तीव्र अशा प्रतिक्रिया कुमटत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश सदाशिव शेटे यांनी राज्य शासनाच्या वतीने एक जाहीर पत्र काढून रुग्णालयांचे तसेच पैशाच्या मागे धावणाऱ्या डॉक्टरांचे एक प्रकारे कान टोचण्याचे काम केले आहे डॉक्टर शेटे यांनी या जाहीरपत्राद्वारे महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र खाजगी तसेच धर्मदाय रुग्णालय एक प्रकारे पैसे कमवण्याची इंडस्ट्री बनली आहे काय असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे रुग्णालयां मध्ये होणारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक रुग्णसेवेच्या कार्याला तसेच वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळीमा फासण्याचा प्रकार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

सर्व रुग्णालय विश्वस्त/अधिष्ठाता/संचालक/व्यवस्थापक, सर्व अंगीकृत खाजगी/शासकिय रुग्णालये महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेल्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे यांच्या पत्रात म्हटले आहे की, देशामध्ये महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारे राज्य आहे. कला, संस्कृती, इ. विविध क्षेत्रात प्राविण्य-प्रामाणिकता या सूत्रावर आधारित महाराष्ट्र राज्याचे नावलौकीक आहे. परंतु काळाच्या ओघा बरोबर कधीकाळी वैद्यकीय क्षेत्र प्रामाणिकपणे सेवा करण्याकरिता अग्रणी स्थानी असताना दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्राकडे म्हणजेच पैसा कमवणे, अर्थकारण करणे व तेही सामाजिक तत्त्वांचे उल्लंघन करत उपचारावरील अमाप खर्च वसूल करणे असेच झाले आहे. परंतु रुग्ण सेवा करत असताना याचा सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहून कार्य करता आले पाहिजे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत मिशन व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेद्वारे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांना लाभ देण्याकरिता माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्तीने सूचना असून “सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये”.

आयुष्मान योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी गंभीर असलेला रुग्ण दाखल करून घेत असताना संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज लिहून घेतला जातो की, “मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही”, मुळात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत संबंधित रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतांना देखील वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे.

माझी रुग्णालय प्रशासनास नम्र विनंती आहे की, “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना” ही देखील राज्य आरोग्य हमी सोसायटी अर्थात आयुष्मान योनजेद्वारे नियंत्रित केली जाते. अपघात झालेल्या रुग्णास पैसे न घेता तात्काळ उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयांवरती आहे. या योजनेअंतर्गत आधार कार्ड/शिधापत्रिका नंतर दाखल केली तरी जिओ टॅगिंग चा अपघात ग्रस्त रुग्णांचा एक फोटो व नंतर एफ.आय.आर. पाठविल्यानंतर योजनेअंतर्गत निधी पाठवला जातो. यामुळे कोणतेही आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसताना अपघातग्रस्त रुग्णांवर तात्काळ उपचार करून रुग्णाचे प्राण वाचवणे हे प्राधान्य ठरते.

राज्यातील एकूण अंगीकृत असलेल्या २०३१ रुग्णालयातील प्रशासनाने / व अंगीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांनी देखील यापुढे रुग्णास तातडीने भरती करून उपचार सुरू करावे. रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवलयाचे निदर्शनास आल्यास संबंधितांना कठोर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी. कार्यवाही करणे हा उद्देश नाहीये कारण बऱ्याच रुग्णालयांचे रुग्णसेवेत उच्चत कार्य असुन त्यांचे मी अभिनंदन करतो. परंतु काही रुग्णालयांच्या गैरकृतीने राज्याच्या सामाजिक संतुलनावरती विपरीत परिणाम होत असून जनसामान्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. याबाबत लोकप्रतिनिधी /प्रसारमाध्यमांमार्फत शासनास जबाबदार ठरविले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकींमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे. सदरील प्रकार चुकीचे असून शासनाचे “सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये” हे ध्येय उद्दीष्ट साद्य करण्याकरीता आपण सर्व सहकार्य कराल ही आशा बाळगतो. असे डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे, अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती,महाराष्ट्र शासन.यांनी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *