धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत कायदेविषयक शिबिर आणि फिरते लोक अदालत वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद यांच्या हस्ते झेंडी दाखवून आज करण्यात आला.
जिल्हा न्यायालय, धुळे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश ए. बी. शर्मा, एस.एम.तपकिरे, वाय.जी. देशमुख, डी.एम.अहेर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रविण कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी के.बी. चौगुले, दिवाणी न्यायाधीश व्ही.एस.मडके, न्यायाधीश ए.एस.नलगे, व्ही.जे.चव्हाण, न्यायाधीश एस.व्ही. मडके, न्यायाधीश एस.एस.सय्यद, सदस्य सचिव डी.एल.एस.ए. पी.एन.कुलकर्णी, न्या.एस.एम.कादरी, न्या.एस.आर.पाटील, न्या.एम.ए.चौधरी, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. डी.एस.महाजन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲड.मधुकर भिसे, जिल्हा न्यायालय प्रबंधक सलीम शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्र.अधिक्षक एम.बी.भट, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्या. माधुरी आनंद म्हणाल्या की, 8 ते 21 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील निवडक गावांमध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पने अंतर्गत फिरते लोक अदालत शिबिर आयोजित केले आहे. ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून पीडीत, गोरगरीब, वंचिताना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक गावातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना लोक अदालत व विविध कायद्याची माहिती देऊन कायदेविषयक जनजागृती केली जाणार आहे. तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी फिरते लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन न्या. माधुरी आनंद यांनी केले.
धुळे तालुक्यात आज 8 जुलै रोजी शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय परीसरात, तर 9 जुलै, 2025 रोजी धुळे तालुक्यातील फागणे येथे, शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे 11 जुलै, 2025, शिंदखेडा तालुक्यातील पाठण येथे 15 जुलै, 2025 रोजी, दोंडाईचा येथे व चुंडाणे ता.शिंदखेडा येथे 17 जुलै, 2025 तसेच साक्री तालुक्यातील शेवाळी येथे 21 जुलै, 2025 रोजी फिरते कायदेशीर साक्षरता शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.