शिरपूर पंचायत समिती येथे शिवराज्याभिषेक दिन
शिवस्वराज्य गुढीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या हस्ते पूजन, स्वच्छता मोहीमसह राबविले विविध उपक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून धैर्य, शौर्य आणि देशभक्तीची शिकवण – गटविकास अधिकारी प्रदीप पवार
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील शिरपूर पंचायत समिती येथे आज शुक्रवारी सकाळी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवस्वराज्य गुढीचे पूजन करून प्रतिस्थापना करण्यात आली . याप्रसंगी पंचायत समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप पवार , बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वैशाली निकम, गट शिक्षण अधिकारी गणेश सूरवाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी , पशुधन विकास अधिकारी संजय कुंवर , सहायक प्रशासन अधिकारी लक्ष्मण कुलकणी , कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री तारकेश्वर काकडे , नितीन पाटील,सौ. पी.आर. पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . शिवस्वराज्य गुढीचे पूजन करून प्रतिस्थापना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन झाले . प्राथमिक शिक्षक मनोहर चौधरी यांनी त्यांच्या सहका-यांसह शिवगौरव लोकगीते आणि पोवाडे सदर केले . सहायक प्रशासन अधिकारी लक्ष्मण कुलकणी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी बोलताना सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक होते. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या राज्याभिषेक दिनाचे विशेष महत्त्व आहे. रायगडावर दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, इ.स. १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेकचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हा सोहळा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.त्यांनी बालपणापासूनच राजकारण, युद्धशास्त्र आणि लोकसेवा यांचा अभ्यास केला होता. म्हणूनच आजही त्यांना जगातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपल्याला धैर्य, शौर्य आणि देशभक्तीची शिकवण मिळते, त्यांच्या विचारांचा आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी श्रीमती निकम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर वाघ यांनी केले .