एमआरपी बाबतचा फलक दुकानात लावण्यास बंधनकारक करण्यात यावे – ऍड.चंद्रकांत येशीराव
धुळे शहर
श्रीखंड खरेदी करणार्या ग्राहकाकडून जास्तीचे घेतलेले आठ रुपये संबंधित दुकानदारास महागात पडले. आठ टक्के व्याजासह ही रक्कम परत करतांना ’त्या’ ग्राहकासाठी दुकानदाराला आपल्या गल्ल्यातून तब्बल १५ हजार रुपये सन्मानपूर्वक द्यावे लागणार आहेत. धुळे जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा सौ. निता देसाई व सदस्या ऍड.रसिका निकुंभ यांनी नुकताच हा निकाल दिला.
या प्रकरणात कैलास भदाणे या ग्राहकाने दिघावे (ता. साक्री) येथील आशापुरी इलेक्ट्रॉनिक्स एंड कोल्ड्रिंक्स चे चालक-मालक हेमंत गोविंद भामरे यांच्याकडून २० ग्रॅम वजनाचे अमूल कंपनीचे श्रीखंड (पॅक) विकत घेतले. श्रीखंडच्या पॅकवर एमआरपी ५२ रुपये (किंमत) असताना दुकानदाराने कैलास भदाणे यांच्याकडून ६० रुपये वसूल केले.दुकानदाराने मुळ किमतीपेक्षा आठ रुपये अधिक घेतले म्हणून कैलास भदाणे यांनी दुकानदाराला विचारणा केली असता कुलिंग चार्जेस म्हणून वाढीव पैसे घेतलेत असे उत्तर दुकानदार भामरे यांनी दिले.यानंतर संबंधित भदाणे यांनी भामरे यांच्याकडे पक्के बिल (पावती) मागितले असता तेही त भामरे यांनी भदाणे यांना दिले नाही.
दरम्यान भदाणे यांनी ऑनलाइन साठ रुपये दुकानदाराला अदा केल्यावर भारतीय जनता पार्टीच्या ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा संयोजक ऍड.चंद्रकांत येशीराव यांच्याशी संपर्क साधला आणि ऍड.येशीराव यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनेनुसार जास्तीचे पैसे घेणार्या दुकानदाराविरुद्ध तक्रार केली आणि संबंधित दुकानदारास नोटीस पाठवण्यात आली. संबंधित दुकानदाराने या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने चंद्रकांत येशीराव व अँड.धनश्री येशीराव यांच्या मार्फत ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवर युक्तिवाद ऐकल्यावर आयोगाच्या अध्यक्षा सौ.निता देसाई व सदस्या ऍड.रसिका निकुंभ यांनी निकाल दिला.
या निकालपत्रात म्हटले आहे,की दुकानदाराने ग्राहकाकडून जास्तीचे घेतलेले आठ रुपये आठ टक्के व्याजासह परत करावेत व तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारारिक त्रासापोटी दहा हजार रुपये दयावेत आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये असे ऐकूण १५ हजार रुपये दुकानदाराने संबंधित तक्रारदार ग्राहकास अदा करावेत.
या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फसवणार्या अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून सदोष सेवा देणार्या दुकानदारावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. वैधमापन शास्त्र विभागा मार्फत सर्व व्यावसायिकांना समज देऊन एमआरपी बाबतचा फलक दुकानात लावण्यास बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.