मुंबई
राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं १०७ वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागांत, तसंच रेल्वेरुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या ९६ धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
पुढचे काही दिवस मुंबई आणि राज्याच्या अनेक भागांत सतत जोरदार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमधे मुसळधार पावसामुळे नद्या भरुन वाहू लागल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनानं सतर्क राहून मदत कार्य करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसंच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसंच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनानं वेळेवर आणि प्रभावीपणे कार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले. या परिस्थितीवर शासनाचं लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.