धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्यात शेती क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामाचे महत्व अनन्यसाधारण आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशावेळी बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत गुणवत्तापुर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरिप हंगाम 2025 च्या आढावा सभेमध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तापुर्ण उपलब्धतेबाबत राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता केलेल्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी WhatsApp क्रमांक 9822446655 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. या सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ईमेलवर सुद्धा पाठवता / नोंदवता येईल.
संबंधीतांनी येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. सदर माहिती को-या कागदावर लिहून त्याचा फोटो Whats app किंवा ई-मेलवर पाठवल्यास सुध्दा आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतक-यांना Whats app चा वापर करणे शक्य नसेल त्यांनी उपरोक्त क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतक-यांना त्यांच्या तक्रारी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत नोंदवता येईल. असे सुनिल बोरकर, कृषि संचालक (निवगुनि) कृषि आयुक्तालय, पुणे यांनी कळविले आहे.