धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी
देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर
विशाखापट्टणम येथे ९ जून रोजी होणार पुरस्काराचे वितरण
धुळे जिल्हा
केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने आज या स्पर्धेचा निकाल जाहीर केला. रोहिणी ग्रामपंचायतीस ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १० लाखांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. आंध्र प्रदेशातील नोव्होटेल, विशाखापट्टणम येथे ९ जून २०२५ रोजी होणाऱ्या २८ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२३-२४ स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता़. त्यामधून धुळे जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर रोहिणी, ता़. शिरपूर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती़. या स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून १८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती, त्यात राज्यात पहिला क्रमांक मिळवून शिरपूर तसलुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतींची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली होती. तर या स्पर्धेसाठी देशभरातून फक्त ६ ग्रामपंचायती या पुरस्काराच्या स्पर्धेत होत्या. त्यातील महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीस सुवर्ण पुरस्कार, पश्चिम मजलीशपूर, जि़. पश्चिम त्रिपुरा (त्रिपुरा) ग्रामपंचायतीस रौप्य पुरस्कार, पलसाणा, जि़. सुरत (गुजरात) आणि सुकाटी जि. क़ेंदुझार (ओडिशा) या ग्रामपंचायतींना ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने ग्रामपंचायती किंवा समतुल्य पारंपारिक स्थानिक संस्थांद्वारे केलेल्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून सेवा वितरण अधिक सखोल/विस्तारित करण्यासाठी ग्रासरूट लेव्हल इनिशिएटिव्हज” या श्रेणी अंतर्गत सुवर्ण, रौप्य आणि ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी १० मे रोजी दिल्लीतील सेंट्रल ज्युरी टीमसमोर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सादरीकरण केले होते.