अवकाळी वादळी पावसामुळे दोन हजार ६६६ खांब ६५ रोहित्र जमीनदोस्त

धुळे जिल्हा

अवकाळी वादळी पावसाने प्रभावीत होऊन दोन हजार ६६६ खांब व ६५ रोहित्र सांगाडे जमीनदोस्त झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाची वीज खंडीत झाली.यामुळे अनेक क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या. अखेर वीज कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस कर्तव्यावर राहून हा प्रश्न सोडावीला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून महावितरणच्या जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीत परिमंडलातील वीज यंत्रणेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्यांवरील सुमारे दोन हजार ६६६ खांब जमीनदोस्त झाले. ६५ ठिकाणी रोहित्र सांगाडे कोसळून नादुरुस्त झाले. हजारो ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्या. बहुतांश ठिकाणी हजारो झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, वीज यंत्रणेतील जनमित्र, अभियंते, दुरुस्ती व देखभालीसाठी नेमलेल्या कंत्राटदार एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यपुर्वक सतर्क राहून बहुतांश प्रमाणात नादुरुस्त झालेली वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात यश मिळविले आहे.

मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व कामे सुरु केलेली आहेत. यात विना अडथळा अखंडित व सुरळीत वीज पुरवठ्यासाठी  वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करणे, स्पेसर्स बसविणे, तारांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या काढणे आदी कामे करण्यात येतात. दरम्यानच्या काळातच अवकाळी वादळी पावसाने थैमान घातल्याने वीज यंत्रणेवर अधिकचा ताण पडलेला आहे. वादळी पावसाने वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रभावीत झाली असली तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्वक अथक परिश्रम घेऊन नादुरुस्त यंत्रणा पूर्ववत करण्यात यश मिळविले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील गावठाण व त्यानंतर कृषीप्रवण भागात प्राधान्य क्रमाने यंत्रणा दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. परिमंडलात सुमारे ६५ ठिकाणी वीज वितरण रोहित्रांचे सांगाडे कोसळून रोहित्र नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली. अशा ठिकाणी उन्मळलेली तारांवरील झाडे बाजूला काढण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला. सुमारे ४२ वीज उपकेंद्रही प्रभावीत झाली होती. तीही तत्काळ दुरुस्त करण्यात आली. हजारो ठिकाणी लघुदाब उच्चदाब वाहिन्या तुटल्या गेल्या. एकूणच विस्कळीत झालेली वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी दिवसाच्या कालावधीसह रात्रीच्या वेळीही अगदी बॅटऱ्यांचा वापर करुन वादळ, वारा आणि पावसातही वीज कर्मचारी कार्यरत राहीले.

वादळी वारा आणि पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत कुठे वीज अपघात होणार नाही याची काळजी घेत लाईन फॉल्ट शोधून दुरुस्ती मोहीम राबवत वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात आली. अशा प्रतिकूल काळात ग्राहकांनी क्षेत्रिय पातळीवर काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना थेट फोन न करता विजेसंबंधी काही तक्रारी असतील तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डी.एस.एस. कंट्रोल रुमशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्याकरीता ७७९८१२०१५५, धुळे ७८७५७६६७६३ व नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५५५४५४३ या क्रमांकावरुन डी.एस.एस. कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. या शिवाय १९१२, १८००२३३४३५ व १८००१०२३४३२ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे. प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी फोन केल्याने त्यांच्या कामात अडथळे येवून प्रसंगी त्यांचा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपरोक्त प्रमाणे दिलेल्या क्रमांकावरच नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात. असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *