हेंकळवाडी शिवारात छत्तीसगडच्या तिघांना लुटले ; ठकबाज टोळीचा पुन्हा करारनामा

धुळे जिल्हा

धुळे तालुक्यातील हेंकळवाडी,  अजनाळे येथील ठगबाजी करणाऱ्या लुटारू टोळ्यांनी मोठा धुमाकूळ घातला असून छत्तीसगड राज्यातील तिघांना जुन्या चलनाचे आमिष दाखवून हेंकळवाडी शिवारात बोलऊन त्यांची लाखो रुपयांची रोकड आणि महागडे मोबाईल लुटले. याप्रकरणी तालुका पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत एकांश इंद्रजितसिंग वाडीले (२५, रा. खेडा कॉलनी, मंगेली जि. मुंगेली, छत्तीसगड) याने पोलिसांत दिलेल्या फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, इन्स्टाग्रामवर त्याने सेकंड हॅण्ड करन्सीची पोस्ट पाहिली. हेंकळवाडी येथील रामदास पवार याने १ लाखाचे ७ लाख आणि २ लाखाचे १५ लाख देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार एकांश वाडीले हा त्याचा मित्र अकील बाबुखान पठाण आणि अमितकुमार सुरेंद्र कुमारसिंग, दोन्ही रा. नवी दिल्ली यांच्यासोबत १७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता हेंकळवाडी शिवारात आला. यावेळी ठगांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील १ लाख ३२ हजारांची रोकड व तीन महागडे मोबाईल हिसकावले. तसेच त्यांना हाता-बुक्क्यांनी मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठले. एकांश वाडीलेच्या फिर्यादीवरून संशयित रामदास पवार, शामलाल पवार, अजय भोसले, बबलू चव्हाण, सागर, अल्पेश, संदीप, सर्व रा. हेंकळवाडी, ता. जि. धुळे यांच्याविरूद्ध बीएनस कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुका पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल होताच डीवायएसपी सागर देशमुख यांनी ठगांना तात्काळ शोधून काढण्याचे आदेश पथकाला दिले. त्यानुसार पोलिसांनी शामलाल पवार, अजय भोसले आणि अल्पेशला ताब्यात घेतले आहे. दरोड्याचा तपास पीएसआय दीपक धनवटे करत आहेत.

साक्री तालुक्यातील जामदा आणि धुळे तालुक्यातील हेंकळवाडी आणि अजनाळे गावातील ठग हे बाहेरील पार्ट्यांना सुलेमानी पत्थर, दुतोंडी साप, सफेद भिलावा, कस्तुरी, २१ नखं कासव, पैशांचा पाऊस, तांब्याची तार, चलन आदी आमिष दाखवून लुटत असतात. यासाठी ठग हे सोशल मीडियाचा चपखल वापर करतात. गेल्या १८ एप्रिल रोजी अजनाळे गावात जालन्याच्या तरुणाला लुटण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २ मे रोजी लखनऊच्या चौघांची लूट अजनाळे गावातच झाली. या दोन्ही घटनांमधील साम्य म्हणजे ठकबाजीचे शिकार झालेल्या लोकांना चलनाचे आमिष दाखविण्यात आले होते. आता हेंकळवाडीत घडलेल्या घटनेतही सेकंड हॅण्ड करन्सीचाच वापर फसवणुकीसाठी करण्यात आला.
एसपी श्रीकांत धिवरे यांनी अशाप्रकारची ठकबाजी रोखली जावी म्हणून जामदा, हेंकळवाडी, अजनाळे येथील २३ भामट्यांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु, पोलिसांकडून ठगांवर फौजदारी कारवाई होवूनही त्यांच्या टोळींमध्ये कुठलाही धाक राहिलेला नाही. यावर आता पोलिसांना अधिक कठोर उपाय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *