आमदार म्हणून नव्हे तर सालदार म्हणून तुमच्या विकासाला प्राधान्य – आमदार अनुप अग्रवाल

 

एबी फाउंडेशन, भाजप कामगार मोर्चातर्फे लाभार्थ्यांना कीटवाटप

धुळे जिल्हा

मी धुळे शहराचा आमदार नव्हे, तर तुमचा सालदार म्हणून काम करत आहे. त्यातून समाजातील प्रत्येक गोरगरीब घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी झटत आहे. यात आजपासून एबी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चातर्फे कामगार बांधवांसह महिलांना गृहोपयोगी भांडी व कामगार कीटचे वाटप आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त तपासणी शिबिरही सुरू झाले आहे. या उपक्रमाचा संबंधित लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे शहराचे भाजपचे आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी आज केले.

आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी एबी फाउंडेशन व भाजपच्या कामगार मोर्चातर्फे कामगार लाभार्थी मेळावा झाला. त्यात आमदार अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तू व कीटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, जिल्हा सरचिटणीस भारती माळी, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समितीचे माजी सभापती सुनील बैसाणे, ओमप्रकाश खंडेलवाल, जितेंद्र चौवटिया, यशवंत येवलेकर, भिकन वराडे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस सुनीता सोनार, धुळे महानगराध्यक्ष भागवत चितळकर, धुळे महानगर उपाध्यक्ष देवा मिस्तरी, ॲड. किशोर जाधव, निशा चौबे, नेहा अहिरराव, उमा कोळवले, मोहिनी धात्रक आदी उपस्थित होते.

आमदार अग्रवाल म्हणाले, एबी फाउंडेशन व भाजप कामगार मोर्चातर्फे आजपासून रोज २०० जणांना भांड्यांच्या कीटचे मोफत वितरण करण्यात येत आहे. या कीटमध्ये ३० हजार रुपयांची विविध प्रकारची भांडी आहेत. आतापर्यंत सुमारे चार हजार जणांनी माझ्या संपर्क कार्यालयात नोंदणी केली आहे. यात रोज २०० जणांना कीटचे वाटप केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. आहेत. यात समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही झटत आहोत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण मला दिलेल्या आशीर्वादातून उतराई होण्यासाठी मी झटत आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज एबी फाउंडेशनतर्फे बांधकाम कामगार व महिलांसाठी रक्त तपासणी शिबिरही आयोजित केले आहे. यात विविध आजारांसाठी कराव्या लागणाऱ्या रक्त तपासण्याही रोज विनामूल्य करण्यात येतील. यातून सर्वांना हेल्थ कार्ड देण्यात येणार आहे. त्यातून विविध आजारांवर मोफत उपचारही करण्यात येणार आहेत.

एबी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील कोणत्याही महिला-पुरुष, युवक-युवती, बालकांना आरोग्याच्या काहीही समस्या असतील, त्यांनी माझ्या शहरातील राजवाडे बँकेसमोरील जुन्या किंवा मालेगाव रोडवरील नवीन संपर्क कार्यालयात संपर्क साधावा. यातून कुठलाही रुग्ण उपचारांविना राहणार नाही. माझ्याकडून जे- जे शक्य आहे ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचा समाजातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले. तुम्ही आजवर मला भरभरून प्रेम, आशीर्वाद दिले. आगामी काळात मी पुन्हा तुमच्याकडे प्रेम, आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहे. या आशीर्वादाच्या व प्रेमाच्या माध्यमातून आपल्याला धुळे महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. केंद्रासह राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. आता महापालिकेतही पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी तयार राहा. त्यातून आपण धुळे शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी पाठीशी राहा. तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम तुमचा हा भाऊ वाया जाऊ देणार नाही. तुमच्या आणि शहराच्या विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.

सोमवारच्या तिरंगा ध्वज यात्रेत सहभागी व्हा!
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले. यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि पाकिस्तानचे हवाई तळ नेस्तनाबूत करत त्यांना चांगलाच धडा शिकवला. कामगार मेळाव्यानिमित्त इथे बसलेल्या प्रत्येक माता-भगिनीला कुंकवाची, सिंदूरची किंमत आणि त्याचे महत्त्व माहिती आहे. यामुळे भारतमातेच्या रक्षणासाठी, आपल्या संरक्षणासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या भारतीय जवानांचे मनोबल, मनोधैर्य वाढावे तसेच आपण सारे भारतीय जवानांच्या पाठीशी आहोत ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या सोमवारी (ता. १९) सकाळी आठला शहरातील अग्रसेन चौक ते महात्मा गांधी पुतळादरम्यान सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व धुळेकर नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजयात्रा काढण्यात येत आहे. धुळेकर बांधवांसह माता-भगिनींनी आपले केवळ तीन तास या उपक्रमासाठी द्यावेत, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *