सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, देशप्रेमी धुळेकरांना सहभागाचे आमदार अनुप अग्रवाल यांचे आवाहन
धुळे शहर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारून भारतीय पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत त्यांना ठार केले. यात सुमारे २६ भारतीय पर्यटकांचा बळी गेला. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सेनेच्या तिन्ही दलांतील जवानांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळे आणि पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला करत ती उद्ध्वस्त केली. यात सुमारे १०० हून अधिक दहशतवाद्यांचाही खात्मा केला. भारतीय सेनेच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ येत्या सोमवारी (ता. १९) धुळे शहरातील महाराजा अग्रसेने चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ११११ फुटांचा तिरंगा ध्वज हाती घेत यात्रा काढण्यात येत आहे. या तिरंगा ध्वज यात्रेत सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह धुळेकर पुरुष, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.
आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात आज दुपारी बाराला पत्रकार परिषद झाली, तीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, जितेंद्र चौवटिया, भिकन वराडे, संदीप बैसाणे, यशवंत येवलेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
आमदार अग्रवाल म्हणाले, की गेल्या २२ एप्रिलला पहलगाव येथे दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला केला. यात त्यांचा धर्म विचारत पुरुषांना बाजूला काढून त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात सुमारे २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पाकिस्तानातील या दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा भारतासह जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच सर्वत्र संतापाची मोठी लाट उसळली. यातून पाकिस्तावर कठोर कारवाई करण्याची एकमुखी मागणी देशभरातून झाली. केंद्र सरकारनेही याची गांभीर्याने दखल घेत भारतीय सेना दलांना पूर्णतः सूट देत ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कारवाईच्या सूचना केल्या. यानुसार भारतीय सेनेच्या तिन्ही संरक्षण दलांनी एकत्रित कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ प्रशिक्षण तळांवर हल्ले करत ते नेस्तनाबूत केले. एवढेच नव्हे तर भारतातील नागरी वस्त्यांना लक्ष्य करत हवाई हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ले करत ते उद्ध्वस्त केले. यातून भारतीय सेनेच्या तिन्ही दलांतील अधिकारी व जवानांनी आपले शौर्य, पराक्रम दाखवत पाकिस्तानचा खडे चारले.
या सर्व कारवाईत भारतीय जवानांनी अभूपूर्व शौर्य दाखवत पाकिस्तानला अद्दल घडवली. भारतीय जवानांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी, आपण सारे भारतीय त्यांच्या पाठीशी आहोत, हे दाखवून देण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी येत्या सोमवारी धुळे शहरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व जाती-धर्मांतील सर्वसामान्य धुळेकर महिला-पुरुष, युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने तिरंगा ध्वजयात्रा काढण्यात येत आहे. शहरातील महाराजा अग्रसेन चौकापासून सकाळी आठला या तिरंगी ध्वजयात्रेला प्रारंभ होईल. तब्बल ११११ फुटांचा तिरंगा ध्वज हाती धरत शहरातून ही तिरंगा ध्वज पदयात्रा महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यात येईल. या ध्वजयात्रेत पोलिस बँड सहभागी होईल. तसेच डीजेवर देशभक्तिपर गीते वाजविली जातील. हा कुठलाही राजकीय उपक्रम नसून केवळ भारतीय जवानांप्रती आदर व देशप्रेम व्यक्त करण्यासाठी सामाजिक उपक्रम असून, त्यात मोठ्या संख्येने धुळेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार अग्रवाल यांनी केले.