शेतकरी महासन्मान निधी योजनांचा धुळे जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार शेतकर्‍यांना लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी
योजनांचा धुळे जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार शेतकर्‍यांना मिळतोय लाभ

धुळे जिल्हा

अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने, राज्य शासनाच्या समन्वयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु केली आहे. तर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनांचा धुळे जिल्ह्यात १ लाख ५८ हजार शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे.
या योजनेमध्ये पी. एम. किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये राज्य शासनाने आणखी ६ हजार रुपयांची भर घातली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकर्‍यांना एकंदरीत १२ हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे. आजपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे १९ हप्ते वितरीत केले आहे. तर ’नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत ६ हप्ते वितरीत केले आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतर्ंगत एकूण १ लाख ६९ हजार ८२० लाभार्थीनी नोंदणी केली आहे. त्यात धुळे तालुका ४९ हजार २२४, साक्री तालुका ४९ हजार ४४७, शिरपूर तालुका ३२ हजार १५२, तर शिंदखेडा तालुका ३८ हजार ९९७ याप्रमाणे शेतकर्‍यांचा समावेश आहे. यापैकी धुळे तालुका ४६ हजार ५९४, साक्री तालुका ४५ हजार ७८६, शिरपूर तालुका २९ हजार ५६६, तर शिंदखेडा तालुका ३६ हजार ३०९ असे एकूण १ लाख ५८ हजार २५५ शेतकरी लाभार्थी प्रत्यक्ष लाभ घेत आहेत.

अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ८९४ शेतकर्‍यांनी ई-केवासीपूर्ण केली नाही. यात धुळे तालुका १ हजार २३५, साक्री तालुका १ हजार ३८६, शिरपूर तालुका १ हजार ०९४, तर शिंदखेडा तालुका १ हजार १७९ शेतकरी आहेत. तर ५ हजार ५१८ शेतकर्‍यांची आधार सिडींग प्रलंबित असून १ हजार २१८ शेतकर्‍यांची लँड सिडींग प्रलंबित आहे. या दोन्ही योजनांमुळे धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत झाली असून ऐन खरीप हंगामात या रक्कमेचा शेतकर्‍यांना उपयोग होत आहे.

तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे तसेच ज्या लाभार्थ्यांची पीएम किसान पोर्टलवरील माहिती चुकीची असल्यामुळे लाभाची रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी आपले आधारकार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (७/१२ इत्यादी) नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषीसेवक तसेच नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून माहिती अद्यावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *