पाकिस्तानच्या भेकड हल्ल्याला भारत देणार मूहतोड जवाब

पाकिस्तानाला सडेतोड उत्तर दिलं जाणार, भारताचा थेट इशारा

नवी दिल्ली

यापुढं केलेली कोणतीही आगळीक केवळ परिस्थिती चिघळवणारी असेल, आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं जाईल, असा स्पष्ट इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे.

सध्या पाकिस्तानबाबत सुरू असलेली परिस्थिती आणखी चिघळवण्याचा भारताचा हेतू नाही, मात्र लष्करी हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत भारत-इराण संयुक्त आयोगाच्या विसाव्या बैठकीत बोलताना सांगितलं.

आज संध्याकाळी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्री यांनी सांगितलं की, जागतिक दहशतवादाचं केंद्र म्हणून पाकिस्तानची प्रतिमा जगभरातल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिसून आली आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला होता, याकडे निर्देश करुन ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये लश्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद सारख्या संयुक्त राष्ट्रांनी सूचीबद्ध केलेल्या दहशतवादी गटांना मोठ्या प्रमाणात आश्रय आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचं चित्रही त्यांनी दाखवलं. काल पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरमधल्या शीख समुदायालार लक्ष्य केलं, पूंछमधे गुरुद्वारावर हल्ला केला आणि शीख समुदायाच्या सदस्यांना मारहाण केली, असं त्यांनी सांगितलं. सिंधू पाणी कराराबाबत मिस्री म्हणाले की, पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून जाणूनबुजून अडथळे निर्माण करत आहे.

पाकिस्ताननं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून उत्तर आणि पश्चिम भारतातल्या अनेक लष्करी भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी हे प्रयत्न हाणून पाडले, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *