दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध, मृतांना वाहिली सामूहिक श्रध्दांजली
आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळा गावीत यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते सहभागी
धुळे जिल्हा
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी रात्री धुळे शहरातून जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी धुळेकर नागरिकांनी हाती मशाल घेऊन हल्लेखोर दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. “एक धक्का और दो पाकिस्तान को तोड दो, देश के गद्दारोको गोली मारो,” अशा घोषणा देणारे बॅनर पकडून आपला संताप व्यक्त केला. मोर्चात शहराचे आमदार अनुप अग्रवाल, साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्यासह भाजप तसेच शिंदेसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धुळे शहरातील आग्रा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या जन आक्रोश मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सहभागी महिला, तरुणांनी हातात मशाल आणि विविध घोषणांचे बॅनर हातात पकडले होते. मोर्चाचा समारोप महात्मा गांधी पुतळा चौकात झाला.
यावेळी धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी सांगितले की, जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे जिहादी मानसिकतेच्या अतिरेक्यांनी पर्यटकांचा धर्म विचारुन हिंदू असलेल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात जी एकजुटता आपण धुळेकर नागरिकांनी दाखविली आहे. हीच एकजुटता आपल्याला यापुढेही दाखविणे गरजेची आहे. त्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे, आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, या हल्लेखोरांना त्यांनी कल्पना ही केली नसेल अशी सजा देणार.. सरकार निश्चितच या हल्ल्याचा बदला घेईल. असा विश्वास व्यक्त केला.
धुळेकर नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मूक जनआक्रोश मोर्चात धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल, शिंदेसेनेच्या साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत, अल्फा अग्रवाल, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, हिरामण गवळी, प्रवीण अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, अमोल मासुळे, मायादेवी परदेशी, प्रभा परदेशी, वैशाली शिरसाठ, भिकन वराडे, अमोल मराठे, रवींद्र आघाव, ओमप्रकाश अग्रवाल, विक्की परदेशी तसेच व्यापारी महासंघाचे नितीन बंग, राजेश जिंदोडिया, खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिराचे प्रमुख सोमनाथ गुस्व, भगवान गवळी, तृतीय पंथीय सांप्रदायच्या प्रमुख पार्वती जोगी यांच्यासह पदाधिकारी देखील या मूक जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले.