मुंबई
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक निकालावरून कॉग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते तथा कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखावरून निवडणूक आयोगाने थेट संवाद साधण्याचा सल्ला दिला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता, त्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा हे आवाहन केलं. गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी, तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला १५ मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांनी ही भेट टाळली. गांधींचे आरोप इतके गंभीर आहेत मात्र ते तक्रार लिखित स्वरुपात देण्याचं टाळत आहेत, हे आश्चर्यजनक आहे, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही? कॉग्रेसचा सवाल
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलतात या आक्षेपावर प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, हे निवडणूक आयोगाला मान्य नाही का, असा सवाल सपकाळ यांनी विचारला.