धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यात गेल्या सन 2018-25 या सात वर्षात 60 कोटी 70 लाखांचा सीएसआर निधी खर्च केला गेला आहे. पंरतू हा निधी प्रत्यक्ष खर्च केला का? याबाबत चौकशी व्हावी व बेकायदेशीर काम करणार्या कंपन्यांवर कारवाई करावी. तसेच चालु वर्षात राज्यात 122 कोटी निधी दिला जाणार आहे. तर धुळे जिल्ह्यात 1 कोटी 11 लाखांचा निधी मिळेल, हा सीएसआरचा निधी सामाजिक काम करणार्या संस्थांना वाटप करावा, अशी मागणी महाराष्ट्र एनजीओ समितीची असल्याची माहिती आज संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ. युवराज येडूरे यांनी पत्रपरिषदेत दिली.
धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेला समितीच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. सुनिता मोडक, राज्य चिटणीस लक्ष्मण डोळस, शितल सोनवणे, राज्य संपर्कप्रमुख पूजा खडसे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. येडूरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य एनजीओ समितीतर्फे शैक्षणिक संस्था, खाजगी कंपन्या आणि इतर क्षेत्रांमधून सीएसआर अंतर्गत खर्च होणार्या निधीबाबत पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरवर्षी सुमारे 122 कोटी रूपयांचा सीएसआर निधी राज्यातील जिल्हास्तरावर खर्च होता, पण त्या निधीचा सामाजिक उपयोग किती आणि कुठे होता, याबाबत अस्पष्टता आहे. राज्याचाच विचार केला असता सीएसआर (कॉर्पेरेट सोलश रिस्पॉस्निबिलिटी) निधी हा राज्यात 5 हजार 808 कंपनीच्या माध्यमातून 2025-26 मध्ये निधी उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्याचाच विचार केल्यास गेल्या सात वर्षात 60 कोटी 70 लाखांचा सीएसआर निधी खर्च झालेला आहे. त्याचा कार्य अहवाल शासनस्तरावर कंपनीने सादर करून सीएसआरच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. पण हा निधी प्रत्यक्ष खर्च केला गेला का, याबाबत चौकशी व्हावी. तसेच सीएआर निधी सामाजिक संस्थांना मिळावा, अशी आमची मागणी आहे. तसेच सीएसआर निधीबाबत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी. शैक्षणिक संस्था व कंपन्यांनी अधिकारी नियुक्त करावा. सीएसआर निधीची माहिती सार्वजनिक प्रसारित करावी तसेच कंपनीने आपल्या संकेतस्थळावर सीएसआर मागणी अर्ज व चेकलिस्ट उपलब्ध करावी. सामाजिक संस्थांना योग्य दस्ताऐवजच्या आधारे निधी वाटप करावा, अशी समितीची मागणी असल्याचेही डॉ. येडूरे यांनी सांगितले.
शंभर संस्थांना देणार न्याय- अनेक जण वर्षानुवर्षापासून सामाजिक संस्था चालवित आहेत. त्यातील अनेक मोडकळीस आलेल्या आहेत. सामाजिक संस्थांनी व्यवस्थीत कागदपत्रे बनविले तर त्यांना सीएसआर निधीचा लाभ मिळू शकतो. आम्ही शंभर संस्थांना न्याय मिळवून देणार आहेत. आम्ही हा निधी मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा, काय कागदपत्रे आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे देखील आयोजन केले असल्याचे समितीच्या उपाध्यक्षा डॉ. मोडक यांनी सांगितले. तसेच ज्या कंपन्यांनी सीएसआर निधी खर्चा केला तो कसा केला हे त्यांनी दाखविले पाहीजे, अशी मागणी आम्ही सर्व एनजीओच्या वतीने करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पांडुरंग संस्था जिल्ह्यात 400 गावात
राबविणार स्वच्छ पाणी अभियान
दोंडाईचा येथील पांडुरंग बहुद्देशीय संस्था ही धुळे जिल्ह्यात 400 गावांमध्ये स्वच्छ पाणी अभियान राबविणार आहे. यासाठी आधी गावातील लोकसंख्येची माहिती घेतली जाईल. त्यानंतर गावात आरओ प्लांट बसविले जातील. त्यातून एक रूपया लिटर प्रमाणे येणारे पैसे हे ग्रामपंचातीला आरओची देखभाल दुरूस्ती आणि बिलासाठी दिले जातील, असे या संस्थेच्या अध्यक्षा पुजा खडसे यांनी सांगितले.