आरसीबीच्या विजयाला गालबोट, बंगळुरुच्या स्टेडियमवर चेंगराचेंगरीत 11 क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू

आरसीबीच्या विजयाला गालबोट, आयपीएल विजयोत्सवावेळी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरीत 11 क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू

बंगळुरू

आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाच्या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तुफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर या चेंगराचेंगरीत दहा पेक्षा जास्त चाहते जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले होते.  स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा हे चाहते प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. मिळालेल्या माहितीनुसार चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली, यात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी लोकांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. सरकार जखमींवर मोफत उपचार करणार आहे. आम्हाला या घटनेचं राजकारण करायचं नाही. मी या घटनेच्या न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत. 15 दिवसात रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणाले.

काँग्रेस सरकारचे हात रक्तानं माखलेले – भाजपचा आरोप

भाजप आणि जेडीएसनं या प्रकरणी कर्नाटकमधील राज्य सरकारला जबाबदार ठरवत टीका केली. कर्नाटक भाजपानं एक्सवर पोस्ट करुन म्हटलं की, 7 लोकांचा मृत्यू झाला, काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळं चेंगराचेंगरी होऊन काही लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. कोणती पायाभूत व्यवस्था नव्हती. फक्त अराजकता होती, निर्दोष लोक मारले गेले. सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार क्रिकेटर्ससोबत रील  शूट करण्यात आणि प्रसिद्धीच्या झोतात येण्यात व्यस्त होते. हा बेजबाबदारपणा असून काँग्रेस सरकारचे हात रक्तानं माखलेले आहेत, असा आरोप भाजपनं केला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *