धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक : मा.आ.प्रा.शरद पाटील

धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठासाठी माजी आमदार शरद पाटील यांच्या पाठपुराव्याने हालचालीना वेग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना, कृषी मंत्री कोकाटेंकडून प्रस्ताव सादर होणार

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भातील प्रस्ताव सादर करणार आहेत. ही माहिती धुळे कृषी विद्यापीठ निर्माण समितीचे निमंत्रक आणि माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी मंगळवारी (दि. ३) गुलमोहर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पुणे येथे १ जून रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११९व्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला होता. कृषी मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यावर चर्चा झाली. यावेळी प्रा. पाटील यांनी धुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मांडून कृषी मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळवले.
प्रा. पाटील यांनी बैठकीत २००९ पासून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी डॉ. एस.वाय.पी. थोरात समिती आणि डॉ. व्यंकटेश्वरलू समितींच्या अहवालांतील सकारात्मक नोंदींचा हवाला दिला. धुळे जिल्ह्यातील सुमारे ३५० ग्रामपंचायतींचे ठराव, विविध आंदोलने, विधिमंडळातील प्रश्नोत्तरांची माहिती, विद्यार्थी संघटनांची निवेदने, आणि उपलब्ध सुविधा यांची सविस्तर माहिती कृषी मंत्र्यांना दिली.

धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत अद्याप शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आदिवासीबहुल नंदुरबारमधील वनसंपदा, धुळ्याचे कोरडवाहू कापूस, कांदा, कडधान्य तसेच केळीखेरीज इतर पिकांवरील संशोधनाच्या अभावामुळे खान्देश विद्यापीठाची गरज भासते, असे पाटील यांनी ठणकावले. यापूर्वी आरोग्य, मुक्त व आदिवासी संशोधन विद्यापीठांचा अन्यायपूर्ण अपहार झाल्याचे त्यांनी निदर्शित केले.

या बैठकीला कृषी आयुक्त डॉ. सुरेश मांढरे (आयएएस), कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, उपाध्यक्ष तुषार पवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धिरजकुमार कदम, स्मार्टचे राज्य प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर (आयएएस) आणि विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकारी उपस्थित होते. यामध्ये परभणीचे डॉ. इंद्रमणी, राहुरीचे गणेश शिंदे, कोकणचे विनायक काशीद, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्रविण देशमुख यांचा समावेश होता. बैठकीच्या शेवटी कृषी मंत्री कोकाटे यांनी, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यापीठ विभाजन प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाईल आणि अंतिम निर्णयासाठी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाईल,” असे ठाम आश्वासन दिले. त्यामुळे खान्देशातील विद्यापीठ निर्मितीची प्रक्रिया मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *