`एमआरआय’ मशिनअभावी धुळ्यात हजारो रुग्ण निदान, उपचारांपासून वंचित
खासगी रुग्णालयांमध्ये नाइलाजाने सहन करावा लागतोय हजारोंचा भुर्दंड
आमदार अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मांडली गंभीर स्थिती
मुंबई
धुळे येथील जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षांपासून एमआरआय मशिन उपलब्ध नसल्याने हजारो रुग्णांची हेळसांड होत आहे. एमआरआय मशिन उपलब्धतेबाबत अनेकदा अनेक पातळ्यांवर मागणी झाली. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालयात अनेक आजारांचे निदान व त्यावरील उपचारांपासून हजारो गरीब रुग्ण वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात तातडीने एमआरआय मशिन उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केली.
याबाबत आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच निवेदन दिले. त्यात ही आग्रही मागणी केली. दरम्यान, आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.
निवेदनात म्हटले आहे, की धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात तसेच शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात केवळ धुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, तसेच शेजारील नंदुरबार जिल्ह्यातील हजारो रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. शिवाय धुळे जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची संख्याही मोठी असते. यातील गंभीर जखमींनाही येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, कुठेच एमआरआय मशिनच उपलब्ध नसल्याने विविध अत्यावश्यक तपासण्याच करता येत नाहीत. यामुळे रुग्णांच्या आजाराचे नेमके निदान करण्यातही डॉक्टरांना अडचणी येतात. तसेच रुग्ण संबंधित उपचारांपासून वंचित राहतात. यातून अनेकदा गंभीर रुग्णांना आपल्या प्राणांनाही मुकावे लागत आहे.
हजारो रुग्णांकडून वारंवार तक्रारी
ही अतिशय गंभीर स्थिती असून, जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांसाठी एमआरआय मशिन तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत अनेकांनी पाठपुरावा केला. मात्र, त्यात यश आले नाही. वास्तविक, यापूर्वीच येथील जिल्हा रुग्णालयाला हे मशिन प्राप्त होणे गरजेचे होते. मात्र, कार्यवाही झाली नाही. यातच आमदार अनुप अग्रवाल यांनी रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक रुग्णांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. केवळ एमआरआय मशिनअभावी गोरगरीब रुग्णांना वेळेत आजाराचे निदान व त्यावरील उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून आमदार अग्रवाल यांच्याकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत एमआरआय मशिन उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी होत आहे.
मुख्यमंत्र्यांकडून तातडीने कार्यवाहीचे आश्वासन
निवेदन देताना आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एमआरआय मशिनअभावी रुग्णांचे होणारे हाल आणि परिस्थिती नसतानाही अनेक गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत जाऊन एमआरआय तपासणीसाठी हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच हजारो रुग्णांना दिलासा देऊ शकणाऱ्या या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत तत्काळ एमआरआय मशिन उपवब्ध करून देण्याची विनंती केली. त्यावर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार अग्रवाल यांना दिले.