अहिल्यानगर
अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत कृषी, कर आणि न्याय पद्धती आदर्श होती. त्यांनी केलेलं कार्य तीनशे वर्षांनीही प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आयोजित जयंती उत्सवात ते बोलत होते. यावेळी विविध विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
अहिल्याबाईंनी दलित, वंतितांच्या उत्थानासाठी अनेक योजना आणल्या, एवढं मोठं ऐश्वर्य असूनही त्यांनी साधी राहणी स्वीकारली म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक म्हणतात, असं फडणवीस म्हणाले. मंदिर, घाटांची उभारणी, वस्रोद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात अहिल्याबाईंच्या राज्यात प्रगती साधली असं मुख्यमंत्री म्हणाले.
सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या अभिमान होत्या, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारी खजिना हा लोकांसाठी असतो ही शिकवण अहिल्यादेवींनी दिली, स्वतःच्या मुलीचं आंतरजातीय लग्न लावून जातीभेदाला गाडण्याचं काम केलं. त्यांनी माणुसकी आणि कल्याणाचा धर्म पाळला, असं शिंदे म्हणाले.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. राज्य सरकारने चौंडी इथल्या विकास आराखड्यासाठी ६८१ कोटी मंजूर केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. जयंती उत्सवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं होतं. मात्र ते येऊ शकले नाहीत. पण पुढच्या वर्षी प्रधानमंत्र्यांनी यावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, असं शिंदे म्हणाले. यावेळी राज्य शासनाच्या लोकराज्य या मासिकाच्या विशेष अंकाचं प्रकाशन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत.
त्याआधी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने चौंडी ते इंदोर या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.