धुळे जिल्हा
धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृह प्रकरण म्हणजे मनीलॉंड्रिंगचा प्रकार असून खरेतर याप्रकरणी अंदाज समितीच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल व्हायला हवा. मात्र हे सरकार एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला दडपत आहे आणि दुसरीकडे मात्र येथील पालकमंत्र्यांना राजकीय आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यावर तत्परतेने खोटे गुन्हे दाखल केले जातात, हा या जिल्ह्यातला आणि राज्यातला राजकीय दहशतवाद आहे. असा जोरदार आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
खा.संजय राऊत यांनी आज धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्राम गृहात सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, माजी आमदार अनिल गोटे व सहसंपर्क प्रमुख अद्वय हिरे आदी उपस्थित होते.
यावेळी खा.राऊत म्हणाले,महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आपण उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलो आहोत. अलीकडे धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्राम गृहातील १०२ क्रमांकाचा कक्ष संपूर्ण भारतात गाजतो आहे. या खोलीमध्ये मिळालेला माल कोणाचा होता याबद्दल आणखी काहीही स्पष्ट होत नाहीये, यामुळे या खोलीवर सिनेमा काढावा लागेल.
धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे पणन व राजशीष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे नाव न घेता खा.राऊत म्हणाले, पालकमंत्र्याच्या दबावामुळे शिंदखेडा येथील राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला,यावरून राज्यात काय चाललंय याची कल्पना येऊ शकते.येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कक्ष क्र.१०२ मध्ये सापडलेल्या पैशासंदर्भात लगेच गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले नाही. पालक मंत्र्यांना आव्हान देणाऱ्या एका कार्यकर्त्यावर मात्र पोलीस प्रमुख गुन्हा दाखल करण्याची केवढी तत्परता दाखवतात. हा सरळ सरळ या जिल्हातला आणि राज्यातला राजकीय दहशदवाद आहे. हे जरी आज चालले असले,तरी मी पोलीस प्रमुखांना सांगू इच्छितो,की तुम्ही आमचे मनोबल खच्ची करू शकत नाहीत.आम्ही येथे बसलो आहोत मी,अनिल गोटे व अद्वय हिरेअशा प्रकरणांमध्ये तावून-सुलाखून निघालो आहोत. मात्र सामान्य कार्यकर्त्यांवर असा अन्याय कराल,तर याची किंमत नक्कीच चुकवावी लागेल. असा इशारा देखील खासदार संजय राऊत यांनी दिला.
तसेच विश्राम गृह प्रकरणात अनिल गोटे हे मुख्य साक्षीदार आहेत, खोली क्रमांक १०२ प्रकरण आम्ही अजिबात सोडणार नाही. अंदाज समिती ही एक महत्त्वाची कमिटी असून या कमिटीच्या अध्यक्षाला नजराना देण्यासाठी ही रक्कम जमा करण्यात आली. सरकारी रकमेचा अपहार करून ही रक्कम जमा करण्यात आली होती. विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर हे शिंदे गटाचे ते नेते आहेत,त्यांच्यावर याआधी ईडीची कारवाई सुरू आहे असा इतिहास आहे. मंत्र्यांच्या कार्यालयातूनच आता विधिमंडळात भ्रष्टाचार पोहोचला आहे. भ्रष्टाचार करूनच ४० आमदारांना पात्र ठरवण्यात आले अशा शब्दात खा. राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न निशाणा साधला. जालना कांडात जमा झालेले पैसे कुठे आहेत हेही आम्हाला माहित आहे असा उपरोधीक टोलाही खा.राऊत यांनी यावेळी लगावला.