धुळे जिल्हा
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची धुळे येथून छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्न्ती झाल्याबद्दल त्यांना निरोपाचा तर नुतन जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांचा स्वागताचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संपन्न झाला.
या समारंभास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नूतन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, सौ. पापळकर, कुटूंबिय, महसुल, जिल्हा परिषद तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. पापळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतांना ते म्हणाले की, धुळे जिल्हा हा आनंददायी जिल्हा असून त्याबरोबरच संवेदनशील जिल्हा ही आहे. याठिकाणी वन विभागाशी संबंधित आदिवासी बांधवांचे काही प्रश्न आहे. तसेच महसुल विभाग हा शासनाचा चेहरा असल्याने प्रशासनात प्रत्येकाने संवदेनशील राहून काम केल्यास कामाचा आनंद मिळतो. प्रशासनात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढविल्यास प्रशासन व शासनाची प्रतिमा अधिक उंचावण्यास मदत होईल असे सांगून ते म्हणाले की, धुळ्यात काम करण्यास कमी कालावधी मिळाला असला तरी विधानसभा निवडणूक, गुंतवणूक परिषद, आदिवासी बांधवाचे जमीन पट्टे वाटप, कॉपीमुक्त परिक्षा अभियान यासारखी अनेक चांगली कामे झाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. या कालावधीत लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरीकांचे चांगले सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पदोन्न्ती ही एक अधिक चांगले काम करण्याची संधी असून या संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांची सेवा करणार असल्याचे ते म्हणाले.
नूतन जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते म्हणाल्या की, पापळकर सरांनी त्यांचे अनुभवातून जिल्ह्यात केलेले काम हे बेंचमार्क आहे. त्यांनी सुरु केलेले उपक्रम पुढेही सुरु ठेवणार असून जे प्रकल्प, विकास कामे अपूर्ण असतील त्यांचा आढावा घेवून ते पुर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील. तसेच लोकाभिमुख कामाबरोबरच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर, तहसिलदार साहेबराव सोनवणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अजित पाठक, महसुल कर्मचारी संघटना सुरेश पाईकराव, तलाठी संघटना प्रतिनिधी सदाशिव सुर्यवंशी यांनी मनोगत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनी दोघाचांही पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शेलार यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.