महिलांसह गोरगरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध : आमदार अनुप अग्रवाल
धुळे जिल्हा
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार करताना देश-देव आणि धर्मासाठी काम केले. समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्याच कार्याचा वारसा जोपासत केंद्र आणि राज्य सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांचा मतदारसंघातील महिलांसह गोरगरिबांना लाभ मिळवून देतानाच त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी, कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केली.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रविवारी (ता. २५) जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी व कामगार आघाडीतर्फे मेळावा झाला, त्यात आमदार अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रतिभा चौधरी, पक्षाचे शहर सरचिटणीस, चेतन मंडोरे, अल्पा अग्रवाल, जितेंद्र शहा, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, वैशाली शिरसाट, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, या मेळाव्यात एबी फाउंडेशन, भाजप कामगार आघाडीतर्फे आमदार अग्रवाल व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात भांडी वाटप करण्यात आले.
आमदार अग्रवाल म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्य कारभार करताना देश-देव आणि धर्मासाठी काम केले. समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्याच कार्याचा वारसा जोपासत केंद्र आणि राज्य सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. आज समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही योजना राबविली जात आहे. कोणालाही कुठल्याही योजनेची माहिती हवी असेल, त्यासाठी काय कागदपत्रे लागतील, याची माहिती घेण्यासाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधा. या योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करा.
आमदार अग्रवाल म्हणाले, की आपल्या सर्वांसाठी आज अतिशय गौरवाची बाब घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात विविध आघाड्यांवर उत्कृष्ट काम केल्यामुळे आज भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत चौथा क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्ता स्वीकारण्यापूर्वी दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने गेल्या १० वर्षांत अफाट कामगिरी करत आधी इंग्लंडला मागे टाकत पाचव्या आणि आता जपानला मागे टाकत चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकावला आहे. समाजातील प्रत्येकासाठी विविध प्रकारच्या योजनांचा लाभ देऊनही आज भारताने जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, ही आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे.
महिला शक्तीच्या बळकटीकरणाचा प्रयत्न
आमदार अग्रवाल म्हणाले, की पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत कारवाई करताना या मोहिमेचे नेतृत्व दोन महिला सेना अधिकाऱ्यांकडे सोपविले. यातून मोदी सरकारचा दृढ निश्चय दिसून आला. यातून पूर्ण जगाला भारतीय महिलांची ताकद दाखवून दिली. या हल्ल्यात आपल्या देशातील २६ महिलांचे कुंकू दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत पुसले. पाकिस्तानच्या या कुरापती कधीही विसरू नका. कारण यात बळी गेलेले आपले बांधवच होते. सध्या सर्वत्र अराजकता वाढली आहे. यात विशिष्ट समुदाय सहभागी आहेत. गेल्या आठवड्यातच रात्री तीनपर्यंत थांबून कारवाई करत धुळे बाजार समितीत १५० गोवंशांचे प्राण वाचविण्यात यश आले. दोन दिवसांपूर्वी मुंबई, उत्तर प्रदेशातून आलेल्या युवतींकडून धुळे शहरातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांसह रासकरनगरमध्ये होत असलेला धर्म परिवर्तनाचा प्रयत्न हाणून पाडला. संबंधित युवतींसह महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. यामुळे आपल्या आजूबाजूला, कॉलनीत, गल्लीत, परिसरात काय घडते आहे, याकडे सजगतेने लक्ष ठेवा. अशा फसव्या प्रकारांना बळी पडू नका. काही चुकीचे होत असेल, तर मला तातडीने कळवा.
महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, भाजपचे नेते हिरामण गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले. विजय पवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.