धुळ्यात वारकरी भवनासाठी सहा महिन्यांत जागा देणार-आमदार अनुप अग्रवाल 

कान्हदेश वारकरी सेवा मंडळातर्फे वारकरी रत्न पुरस्कारांचे वितरण

धुळे शहर

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आधारस्तंभ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई आदी संतांच्या विचारांची प्रेरणा घेत वाटचाल करणारा हा संप्रदाय भक्ती, समर्पण आणि समाजसेवेचे मूर्त स्वरूप आहे. अशा या संप्रदायाचे खानदेशात नेतृत्व करणाऱ्या कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आश्वस्त करतो, की येत्या सहा महिन्यांत धुळे शहरात ‘वारकरी सेवा संघा’च्या स्वतंत्र भवनासाठी जागा उपलब्ध करून देईन. तसेच पाच वर्षांत हे भवन साकारण्याची ग्वाही देतानाच येत्या काळात या संप्रदायाच्या कार्याला बळकटी देणारे अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धारही आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला.

कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येथील बाजार समिती परिसरातील पवननगरमधील प्रसन्न हनुमान मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम, संकीर्तन सप्ताहाचा समारोप आणि वारकरी रत्न पुरस्कार वितरणाचा सोहळा रविवारी (ता. २५) झाला, त्यात रौप्यमहोत्सवी कीर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा आमदार अग्रवाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भगवान महाराज, यशवंत महाराज, प्रणवगिरी महाराज, उद्धव साक्षी महाराज, हिरामण गवळी, खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे यांच्यासह वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी व खान्देशातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अग्रवाल म्हणाले, की कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आज हा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी संपूर्ण कान्हदेशातून आज येथे संत-महंतांची, महाराष्ट्राचे आध्यात्मिक भूषण असलेल्या वारकऱ्यांची मांदियाळी जमली आहे. हा आपल्या धुळेकरांसाठी मोठा भाग्याचा क्षण आहे. आधी ऋषी प्रदेश असलेल्या व नंतर कान्हदेश झालेल्या आपल्या भागाचे नाव खान्देश असे झाले. आपला प्रदेश पुन्हा कान्हदेश होण्यासाठी आपल्याला मोठी चळवळ उभारावी लागणार आहे. त्यात वारकरी सेवा संघ मोठे योगदान देऊ शकतो. ही चळवळ लोकांपर्यंत नेण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्वांना झटावे लागेल. त्यानंतर विधिमंडळात हा विषय मांडून खान्देशाचे नाव कान्हदेश करण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सर्व संत-महंतांनी यासाठी समाजप्रबोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार अग्रवाल म्हणाले, की धुळे शहरात वारकरी भवनाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी वारकरी सेवा संघाने माझ्याकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून मी महापालिकेला पत्र दिले होते. येत्या सहा महिन्यांत जागेचा प्रश्नही निकाली निघालेला असेल. येत्या पाच वर्षांत वारकरी भवनाचे काम पूर्णत्वास नेईल. पाच वर्षांपूर्वी धुळे शहराला मोठा काळिमा लागला होता. हा काळिमा पुसण्याचे काम धुळेकर जनतेने हाती घेत मला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठविले. चार दिवसांपूर्वी धुळे बाजार समितीच्या आवारात १४० गोवंश आम्ही पकडले. दोन दिवसांपूर्वी मिल परिसरात तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांसह नागरिकांच्या धर्म परिवर्तनाचा प्रयत्नही आम्ही विफल ठरविला. यात मराठी मुलीही सहभागी होत्या, याचे मोठे दुःख झाले. लक्षात ठेवा आपला सनातन धर्मच सर्वश्रेष्ठ आहे. यामुळे सतर्क राहा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या समाजविघातक कृत्यांकडे लक्ष ठेवा. जात-पात सोडून द्या आणि हिंदू म्हणून जगा. तरच आपण टिकू शकू.

भगव्या विचारांचा आमदार निवडून दिला

आचार्य तुषार भोसले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे शहरातून एक है तो सेफ हैचा नारा दिला होता. या नाऱ्याची आपण धुळेकरांना तंतोतंत अंमलबजावणी करताना महाराष्ट्रातील २८८ आमदारांमध्ये आपल्या शहरातून भगव्या विचारांचा आमदार निवडून देत तो विधानसभेत पाठविला. गेली पाच वर्षे जिथे-जिथे धुळे शहराचे नाव येत होते तिथे-तिथे आपणा सर्वांना खाली माना घालाव्या लागत होत्या. ही आपल्यासाठी शोकांतिकाच होती. त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेच्या धुळे मतदारसंघातही झाली. मात्र, विधानसभेला आपण साऱ्यांनी जागे होत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बदला घेत भगव्या विचारांचे सरकार सत्तेत बसविले आणि पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले. आज या पुरस्कारांच्या निमित्ताने ज्यांना तो प्रदान झाला, त्यांचे अभिनंदन करतो.

वारकरी रत्न पुरस्काराचे मानकरी

आमदार अग्रवाल व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल महाराज चौधरी (आळंदी), ज्ञानेश्वर माऊली (बेलदारवाडी) गुरुवर्य कृष्णाजी माऊली (जायखेडा), तुकाराम बाबा जेऊरकर, संदीपन महाराज शिंदे (हासगाव), माधव महाराज घुले (इगतपुरी), मुकुंदकाका जाट देवळेकर, मारोतीबाबा कुऱ्हेकर, विष्णू महाराज चक्रांकित (आळंदी), निवृत्तीदास महाराज (पंढरपूर), रामचंद्र महाराज बोधे (आळंदी), आसाराम बाबा खांदवेकर (आळंदी), डॉ. नारायणराव जाधव (आळंदी), रामकृष्ण महाराज लहवीतकर, बाजीराव नाना चांदिले (आळंदी), परमेश्व महाराज जायभाव (आळंदी), अमृतदास महाराज जोशी (राजूर), तुकाराम महाराज सखारामपूरकर, डॉ. भगवान महाराज आनंदगड (जालना) या महात्मांचा वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मान झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *