धुळ्यात वारंवार लाईट जाण्याच्या प्रकाराने ग्राहकांचा संताप
वीज वितरण कंपनीने त्वरित कारभार सुधारण्याची आवश्यकता
धुळे शहर
शहरात विशेषतः मिलपरिसरात वारंवार बंद होणारा वीज पुरवठा, तासा दर तासाला पाच-पाच, दहा-दहा मिनिटाला जाणारी लाईट यामुळे नागरीक प्रचंड वैतागले आहेत. मिलपरिसरात तसेच धुळे शहरातील अनेक भागात दिवसभर अशा प्रकारे लाईट ये जा येजा सुरु असल्याने वीज ग्राहकांना प्रश्न पडला आहे की? आपण नेमके पैसे कशाचे भरतो? वीज पुरवठा सुरळीतपणे पुर्ण दाबाने मिळावे याचे की, लाईटाचा सुरु असलेला बंद चालू बंद चालू या खेळाचे! सर्व सामान्य वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचेच प्रकार होत असल्याने नागरीकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
मिलपरिसरात परवा वादळी पावसानंतर रात्रभर वीज पुरवठा ठप्प होता. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, झाडे पडली म्हणून वीज गेेली असे वीज वितरणच्या अधिकार्यांचे म्हणणे होते. अनेक ठिकाणी तर १५ ते १६ तास वीज पुरवठा सुरु झाला नाही. वीज वितरण कपंनीच्या लोकांना लाईट गेली, लाईट कधी येणार याची विचारणा करण्याची सुध्दा सोय नागरीकांना नाही, कारण रामवाडी शाखेचा फोन लाईट जातांच नॉट रिचेबल होतो. एक असा तक्रार नोंदवण्याचा क्रमांक सुध्दा दिला जात नाही. त्यामुळे लोकांना केवळ मनस्ताप सहन करण्याशिवाय आणि येणारी वारेमाप लाईट बिले भरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशी अवस्था झाली आहे.
वीज वितरणच्या काराभावर नागरीकांमध्ये इतका संताप निर्माण होण्याचे कारण सुध्दा तसेच आहे. कारण ज्या ज्या वेळी लाईट जाते, त्या वेळी त्यांना जाब विचारला की एकच उत्तर देता काम चालू आहे. मग वीज वितरणच्या अधिकार्याने खरे तर खुलासा करावा कुठे- कुठे किती काम चालू होते? आणि किती काम करता? किती वेळा लाईट बंद केली? सर्व खुलासा महावितरणच्या अधिकार्यांनी करावा. कारण लाईट बिल भरणार्या ग्राहकांना हा अधिकार तर नक्कीच आहे की, कोणते काम चालू होते? किती काम केले? त्याला किती वेळ लागला? असे प्रश्न ते विचारु शकतात. हा सर्व हिशोब मागण्याचा अधिकार ग्राहकांना आहे आणि तो महावितरणने जबाबदारीने द्यायलाच हवा. अशीच नियमितपणे हजारो रुपये लाईट बिल भरणार्या ग्राहकांची रास्त भावना आहे.
वीज पुरवठ्याचा वारवांर होणारा खोळंबा, पुन्हा पुन्हा जाणारी लाईट यामुळे लोक वैतागत आहेत. मिलपरिसरात तर दोन तासांमध्ये दहा वेळा लाईट बंद होते. मग प्रश्न पडतो की, करून कोणते काम होते. अर्धा तास लाईट येते, परत दहा मिनिटे जाते, परत येते – परत जाते. अशा ब्रेक ब्रेक मध्ये कोणते दुरुस्तीचे काम होते. तसेच थोडीही हवा आली किंवा बारीक पाऊस झाला तरीपण सर्वप्रथम लाईट बंद होते. याचा अर्थ महावितरणची वायरिंग इतकी तकलादू आहे कि, महावितरणला तिच्यावर भरोसा नाही आणि म्हणून ते लगेच लाईट बंद करतात. त्यापेक्षा वर्षभर वायरिंग वर, तारांवर काम केले, मजबूत केले तर थोड्याशा हवा किंवा पाऊसाने काही अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता महावितरणने घ्यावी. आमचे बिलांच्या पैशांचे ते काय करतात. आता वेळ बदलली आहे महावितरण मनमानी प्रमाणे लाईट बंद करू शकत नाही, आम्ही बिल भरतो आम्हाला हिशोब हवा, असा प्रश्न देखील सामान्य वीज ग्राहकांमधून विचारला जात आहे.
स्वतंत्र तक्रार क्रमांक जाहिर करावा
वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांसाठी लाईट गेली किंवा इतर कोणती समस्या आली तर २४ तास सुरु राहील असा स्वतंत्र तक्रार नंबर देणे आवश्यक आहे. रामवाडी शाखेतील वीज वितरणच्या अधिकारी कर्मचार्यांना संपर्क साधण्यासाठी जो क्रमांक जाहिर करण्यात आला आहे. तो क्रमांक बराच वेळा बिझी किंवा नॉट रिचेबलच असतो. अशी सर्व सामान्य ग्राहकांची ओरड आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने ग्राहकांसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक जाहिर करावा, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.