जनतेचे प्रश्न वेळीच सोडवले नाही तर, रौद्ररूप दाखवणार – भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर


धुळ्यात वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यास
माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांचा काळे फासण्याचा प्रयत्न

धुळे शहर

भारतीय जनता पक्षाच्या धुळे महानगर जिल्हाध्यक्षपदावर पुन्हा एकदा नियुक्ती झाल्यावर गजेंद्र अंपळक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाने दिलेले पद हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, शोभेसाठी नाही.  असे म्हणत जर प्रशासनातील अधिकारी नागरिकांचे प्रश्न सोडवणार नाहीत पैशासाठी अडवणूक करतील तर भाजपा रौद्ररूप दाखवेल, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासेल. असा इशारा दिला आहे. याचा प्रत्यय सुद्धा आज भाजपच्या माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर यांनी दाखवून दिला.

धुळे शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील रहिवासी भागवत चितळकर यांच्या घरासमोरील धोकादायक विद्युत वाहिनी हटवावी म्हणून सर्व प्रशासकीय सोपस्कार पूर्ण केल्यावरही वीज वितरण विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने आज माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी वीज वितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास काळे फासण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर वीज वितरणच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी मागणीची तत्काळ दखल घेतली जाईल असे सांगून विदयुत वाहिनी हटवण्याचे काम आजच सुरु करण्याचे सांगितले. रखडलेले काम आजच्या आज पूर्ण करू असे लेखी पत्र प्रभारी अधिक्षक अभियंता डी. डी. भामरे यांनी तक्रारदार भागवत चितळकर यांना दिले. यामुळे भाजप महिला नेत्यांनी आंदोलन मागे घेतले. भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उर्ग आंदोलन करण्यात आल्याची माहिती कल्याणीताई अंपळकर यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचा थेट इशारा

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात धुळे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी म्हटले आहे,की सामान्य धुळेकर जनतेकडून  विविध शासकिय कामांसाठी आलेल्या विनंती अर्जाला केराची टोपली दाखविणार्‍या उद्दाम अधिकार्‍यांच्या तोंडाला यापुढे काळे फासण्यात येईल.अशा कामचुकार अधिकार्‍यांच्या नातेवाईकांची बँक खाती आणि मालमत्तांचीही चौकशी करणार आहोत.

शासकीय स्तरावरील कामे करून घेण्यासाठी शासनाच्या विविध पातळीवर सामान्य कार्यकर्ते, श्रमीक कष्टकरी, हमाल, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांच्या प्रतिनीधींना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

काही उद्दाम कर्मचारी, अधिकारी सामान्य जनतेची कामे करतांना जाणीवपूर्वक दिरंगाई करतात.अपेक्षित सहकार्य केले जात नाही.अनेक अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करतात.यामुळे अनेकांची शासकीय कामे निरनिराळ्या शासकीय कार्यालयात अडकुन पडली आहेत.काही कार्यालयात चिरीमीरी शिवाय कुठलेच काम पुढे सरकत नाही असा अनुभव नेहमीच येतो.

जिल्हा पुरवठा कार्यालय,मामलेदार कचेरी,कलेक्टर कचेरीतील निरनिराळ्या शासकीय जनहिताच्या योजना, भुमापन कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय, महानगरपालिकेतील निरनिराळी कार्यालय, जिल्हा आरोग्य विभाग, विद्युत महामंडळ, अशा अनेक शासकीय, निम शासकीय कार्यालयातील उद्दाम कर्मचारी व अधिकारी आपली मनमानी करून, सर्व सामान्यांना वेठीस धरतात.

विविध कारणे दाखवून कामे शासकीय स्तरावर केली जात नाहीत. त्यामुळे सर्व सामान्य जनता नाराज असल्याचे दिसुन आले. व यातुन अध्यक्षांनी शासन स्तरावर्ती योग्य आवाज उठवून,अशा उद्दाम अधिकार्‍यांना कर्मचार्‍यांना जाब विचारून, वटणीवर आणावे अशी संतप्त मागणी होत असल्याने भाजपातर्फे उद्दाम अधिकार्‍यांना धडा शिकविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. असा इशारा पत्रकातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *