गुलमोहर रेस्ट हाऊस ‘कॅश’ प्रकरणी प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्यांकडून चौकशी करा – मा.आ. अनिल गोटे

धुळे शहर

धुळ्यात रात्री गुलमोहर रेस्ट हाऊस च्या खोलीत सापडलेल्या कोट्यवधी रुपयांचे प्रकरण मोठया भ्रष्टाचाराचा भाग असल्याने गुलमोहोर शासकीय विश्रामगृह आणि आरडीसी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी केल्यास अनेक गोष्टी उघड होऊ शकतात. त्यामुळे याप्रकरणी प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच विधीमंडळ अंदाज समितीच्या सर्व आमदारांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

माजी आ.अनिल गोटे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र विधीमंडळाची अंदाज समिती बुधवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती. त्यामुळे गुलमोहोर शासकीय विश्रामगृहात संशयास्पद हालचाली सुरु असल्याचे कळताच तिथे रवाना झालो. मी तेथे येण्यापुर्वी बऱ्याच बाबी तिथून स्थलांतरीत करण्यात आल्या. त्यात पावणे पाच ते पाच कोटी रुपये असावेत असा अंदाज अनिल गोटे यांनी व्यक्त केला. सायंकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत असे १० तास मी विश्रामगृहात ठाण मांडून होतो. त्यामुळे मी येण्यापुर्वी विश्रामगृह परिसरात नेमके काय घडले, तसेच कलेक्टर कचेरीतील आरडीसी कार्यालयात काय घडले या दोन्ही ठिकाणाचे सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करण्यात यावी. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर माझा विश्वास नाही. त्यामुळे तुकाराम मुंडे, प्रवीण गेडाम यासारख्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यात एक आयएएस आणि एक आयपीएस दर्जाचा अधिकारी घ्यावा. त्यांनी कसून आणि सखोल तपासणीसह चौकशी केल्यास बऱ्याच बाबी समोर येतील. तसेच काल जे आमदार समितीसोबत होते त्या सर्वांना या प्रकरणात आरोपी करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले मी तिथे गेल्यानंतर बऱ्याच अधिकाऱ्यांना कळविले. परंतु बराच वेळ होऊनही कोणी आले नाही. समितीची बैठक एका खासगी हॉटेलमध्ये घेण्याचे कारण काय, तिथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना येवू दिले दिले जात नसेल तर या बैठकीत काय गौडबंगाल झाले आहे, याची देखील चौकशी झाली पाहीजे, अशी मागणीही माजी आ.गोटे यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून गांजा हा अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शेकडो एकर जमिनीवर कोट्यवधींचा गांजा पकडण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आता अमली पदार्थांच्या तस्करीत धुळे केंद्रबिंदू ठरत आहे. सापडतो किती आणि पंचनाम्यात दाखवता किती हे देखील संशयास्पद असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी वेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *